Maharashtra Police Bharti 2025:महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आज महत्त्वाचा निर्णय घेत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो युवकांना दिलासा दिला आहे. पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो युवकांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस दलातील तब्बल १५ हजार पदे भरण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र डीजीआयपीआर या एक्स हँडलवरून या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३,५६० पोलिसांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी जून महिन्यात पोलीस महासंचालकांनी सुमारे १० हजार पोलिसांची भरती करण्याचे आणि १५ सप्टेंबरला मैदानी चाचणी होणार असल्याचे सांगितले होते.
मात्र, त्यानंतरही पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी समन्वय समितीने काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. सप्टेंबरपूर्वी शासन निर्णय, अर्ज भरणे, अर्ज छाननी आणि परीक्षा घेणे अशक्य आहे, अशी मागणी विद्यार्थी समन्वय समितीने मागच्याच आठवड्यात केली होती.
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा